बारामती (पुणे) : 'स्त्री आणि पुरुष ही मानवी व्यक्तिमत्वाचे दोन अविभाज्य भाग आहेत. ते दोन्ही समसमान आहेत याची जाणीव आजच्या युगातल्या युवकांना असणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य हा त्याचा मूलभूत हक्क आहे,' असे मत जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रझिया पटेल यांनी व्यक्त केले. तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामधील ‘लिंगभाव आणि विकास पदवीपूर्व आंतरशाखीय प्रमाणपत्र अभ्यासक्रमा'च्या उद्घाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरुमकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
डॉ. पटेल पुढे म्हणाल्या, ‘अनेक वर्षांपासून स्त्रियांचे समाजातील स्थान दुय्यम असल्याचे दिसून येते. धर्म, प्रथा, परंपरा, कौटुंबिक वातावरण या सर्वांमध्ये याची पुनरावृत्ती पहायला मिळते. मानव समाजाचा इतिहास पाहता, या समाजाचा रचनात्मक पाया प्रथम स्त्रीने उभा केला, परंतु आज मात्र तिला तो सन्मान मिळत नाही. तिला मिळत असलेल्या दुय्यम वागणुकीचे मोठे आव्हान येणाऱ्या काळात आपल्या सर्वांना पेलायचे आहे. स्त्री समानतेच्या लढ्यात जबाबदारी घेऊन, पुरुषांचाही तितकाच सहभाग असणे अत्यंत गरजेचे आहे. कारण स्त्रीला दुय्यम वागणूक देणारी बलाढ्य पुरुषसत्ताक संस्कृती हे या समस्येचे मूळ कारण आहे. स्त्री समानता म्हणजे स्त्रियांचा पुरुषांविरुद्धचा लढा नसून, तो दोघांचा केवळ समानतेचा लढा आहे. म्हणूनच या लढ्यात पुरुषांची साथ गरजेची आहे.’
‘माणसाने माणसाशी माणूस म्हणून वागण्याची संस्कृती विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमासोबत जोपासणे हे महाविद्यालयाचे प्रथम उद्दिष्ट आहे. केवळ पुस्तकी ज्ञान न घेता, व्यक्तीस्वातंत्र्याचे महत्त्व जाणून त्याचा आदर विद्यार्थ्यांकडून केला जाईल. स्त्री पुरुष समानतेचे हे मूल्य महाविद्यालयाचा प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनी समाजात पुढे रुजवेल,’ असा विश्वास प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरुमकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केला.
कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक समाजशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. विनायक लष्कर यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्त्री अभ्यासकेंद्राचे समन्वयक प्रा. ललित भवरे यांनी अभ्यासकेंद्र सुरू करण्यामागील भूमिका व त्याचे एकूण स्वरूप आपल्या मनोगतात स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम काकडे आणि कोमल महांगडे या विद्यार्थ्यांनी केले तर, आभार डॉ. प्रतिभा जावळे यांनी मानले. कार्यक्रमाला माजी उपप्राचार्य डॉ. रंजना नेमाडे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा. वैशाली माळी, महाविद्यालयाचे स्त्री आणि विकास अभ्यासक्रम समिती सदस्य, महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.